गोंदिया, दि. 5 — अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी होत असतात. यंदाही १५ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.
महाशिवरात्रीनिमित्त प्रतापगड येथे होणाऱ्या यात्रेच्या व्यवस्थापनासाठी पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार राजकुमार बडोले, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, प्रतापगड ग्रामपंचायत सरपंच भोजराम लोगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, माजी जि.प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नायर यांनी स्पष्ट केले की, यात्रेपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत. पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करून क्लोरीनेशन करावे, तसेच विद्युत विभागामार्फत पथदिवे बसविण्याचे काम वेळेत पूर्ण करावे. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवून आरोग्य पथके कार्यान्वित करावीत. अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची नियमित तपासणी करावी, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेटिंग उभारावे.
यात्रेदरम्यान भाविकांच्या वाहतुकीसाठी एस.टी. महामंडळाने पुरेशा बसेस उपलब्ध करून द्याव्यात. नगरपंचायतीने अग्निशमन व्यवस्था व स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, मदत कक्ष व नियंत्रण कक्ष उभारण्याचे नियोजन करावे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यात्रेदरम्यान मद्यविक्री होणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी प्रतापगड येथील शिवमंदिर व ख्वाजा उस्मान गनी हारुणी दर्गा परिसरात भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन यात्रेपूर्वीच पूर्ण करण्यावर भर दिला. तर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी प्रतापगड तीर्थक्षेत्राच्या सौंदर्यीकरणासाठी जिल्हा विकास निधी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास करण्याची हमी दिली.
महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून, भाविकांना सुरक्षित व सुविधायुक्त दर्शनाचा अनुभव देण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

