चिचोलीत स्मशानभूमी वाद; मृतदेहासह तहसील घेराव

VBN News online news portal
By
Mukesh Kewat
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with...
- Reporter / Correspondent
3 Min Read

भंडारा : मोहाडी तालुकातील चिचोली गावात स्मशानभूमीच्या जागेच्या मोजमापासाठी होत असलेल्या दीर्घ विलंबामुळे ग्रामस्थांचा संताप उफाळून आला. प्रशासनाकडून वेळेत दखल न घेतल्याने अखेर संतप्त नागरिकांनी चक्क मृतदेहासह तहसील व भूमी अभिलेख कार्यालयाला घेराव घातला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

चिचोली गावातील जुना गट क्रमांक ३४६ हा नदीपात्र व नदीकाठाचा भाग असून, अनेक दशकांपासून याच ठिकाणी अंत्यसंस्कार होत असल्याची नोंद अधिकृत शासकीय दस्तऐवजांत आहे. मात्र, अलीकडील काळात लगतच्या काही शेतकऱ्यांकडून या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. परिणामी गावात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेली जागा अपुरी पडू लागली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्मशानभूमीच्या जागेच्या मोजणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून तहसील कार्यालय व भूमी अभिलेख विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. लेखी आदेश असूनही प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत गेला. अखेर अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नसल्याने मृतदेहासह मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या आंदोलनानंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर संबंधित जागेवर प्रत्यक्ष मोजमाप करण्यात आले. प्रशासनाने तातडीने हालचाल केल्याने काही प्रमाणात तणाव निवळला.

प्रभारी तहसीलदार विमल थोटे यांनी ग्रामपंचायतीच्या अर्जानुसार भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणीचे आदेश दिले असल्याचे सांगितले असून, मोजणी अहवाल लवकरच सादर केला जाईल, असे स्पष्ट केले. भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रभारी उपअधीक्षक हरिदास नारनवरे यांनीही आदेशानुसार मोजणी पूर्ण झाल्याची माहिती दिली.

महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

दरम्यान, उपसरपंच विजय लष्करे यांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गावातील सार्वजनिक जमिनीवर झालेल्या अतिक्रमणामुळे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेली स्मशानभूमीच गावकऱ्यांना उपलब्ध नसल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली. गावासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासन केवळ ग्रामस्थांच्या आंदोलनानंतरच हालचाल करत असल्याची खंत व्यक्त करताना, वेळेवर निर्णय घेतले गेले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असेही त्यांनी नमूद केले. वारंवार निवेदन देऊनही महसूल व भूमी अभिलेख विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

या संपूर्ण घटनेमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वेळेत निर्णय न घेतल्यास याचे परिणाम आणखी गंभीर होऊ शकतात, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Share This Article
VBN News online news portal
Reporter / Correspondent
Follow:
Mukesh Kewat is a Maharashtra-based journalist working with VBN News. He reports on cyber crime, technology, public awareness campaigns, social issues, agriculture, and local governance, with a strong focus on credible and ground-level reporting.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *