कामठी | प्रतिनिधी
कामठी शहरात सध्या डासांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक भागांत नाल्यांची योग्य साफसफाई न होणे, एसी ड्रेन कव्हर तुटलेले असणे तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांना मोठ्या प्रमाणात पोषक वातावरण मिळत आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषद नगरसेवक डॉ. अभिषेक चिमणकर यांनी नगरपरिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नगरपरिषद अध्यक्ष अजय अग्रवाल यांना अधिकृत पत्र देत शहरात तातडीने फॉगिंग मशीन सुरू करून जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याची ठोस मागणी केली आहे.
डॉ. चिमणकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, शहरात वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून फॉगिंग मशीनचा नियमित वापर केला जात नाही. परिणामी डासांचा उपद्रव वाढून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात आहे. विशेषतः सोमन नदी परिसर, दाट लोकवस्तीचे भाग आणि बंद नाल्यांच्या परिसरात परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
डॉ. चिमणकर यांच्या मते, सध्या कामठी शहरात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असून भविष्यात एखादी मोठी साथ उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हालचाल करून शहरभर व्यापक फॉगिंग मोहीम राबवावी, अशी त्यांची मागणी आहे.
“ही समस्या फक्त प्रशासनापुरती मर्यादित नसून थेट नागरिकांच्या जीवनाशी संबंधित आहे. कामठी शहरात डासांचा वाढता आतंक चिंताजनक आहे. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही इकोलॉजिकल फाउंडेशनच्या माध्यमातून या समस्येविरोधात लढा देत आहोत. नागरिकांचे आरोग्य आणि भविष्य धोक्यात असताना आम्ही कधीही मागे हटणार नाही,” असे ठाम मत डॉ. अभिषेक चिमणकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शहरातील अनेक नागरिकांनीही डासांच्या वाढत्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता नगरपरिषद प्रशासन या विषयावर कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.