भंडारा | प्रतिनिधी :
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याच्या गंभीर आरोपांमुळे संबंधित शिक्षकाविरुद्ध कडक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद भंडाऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिलिंद सालवे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी शिक्षकाला सेवेतून बर्खास्त करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थिनींना धमकावून अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक अनिलकुमार जनार्दन राठोड (वय ५४) याच्यावर शाळेतील तिसरी व चौथी वर्गातील विद्यार्थिनींना धमकावत अश्लील व्हिडिओ दाखवणे तसेच त्यांच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे. विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर गावात मोठा संताप व्यक्त करण्यात आला.
संतप्त गावकऱ्यांनी घेतला जाब
प्रकरण उघडकीस आल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकाला जाब विचारत मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी पवनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
विद्यार्थिनींना दिली होती धमकी
पीडित विद्यार्थिनी व त्यांच्या मातांनी सांगितले की, आरोपी शिक्षक विद्यार्थिनींना वारंवार धमकावत असे. “हा प्रकार कुणाला सांगितला तर परीक्षेत नापास करीन,” अशी धमकी देत तो बराच काळ विद्यार्थिनींना मानसिक त्रास देत होता. भीतीमुळे अनेक विद्यार्थिनींनी हा प्रकार बराच काळ लपवून ठेवला होता.
यापूर्वीही झाले होते आरोप
या शिक्षकाविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारचे आरोप झाल्याची माहिती पुढे आली आहे. २०१८ मध्ये एका शाळेत विद्यार्थिनींशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याची बदली करण्यात आली होती. मात्र त्या वेळी कठोर कारवाई न झाल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिक्षण विभागाची हालचाल
जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांनी संबंधित शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला होता. त्यानंतर CEO मिलिंद सालवे यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोपी शिक्षकाच्या बर्खास्तीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांत संताप
या घटनेमुळे पालक, सामाजिक संघटना आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित जागा असावी, परंतु अशा प्रकारच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोषी शिक्षकावर कठोर कारवाई करून पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
