नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री यांनी सादर केलेल्या केंद्रीय बजेट 2026 मुळे देशभरात राजकीय, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर मोठ्या चर्चा सुरू आहेत. आरोग्य, रेल्वे, करप्रणाली, महिला सक्षमीकरण, शेअर बाजार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचा या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
आरोग्य व मेडिकल टुरिझमवर भर
देशात ३ नवीन आयुर्वेदिक AIIMS उभारण्याची घोषणा करण्यात आली असून भारताला मेडिकल टुरिझम हब बनवण्याचा सरकारचा निर्धार आहे. कर्करोग व मधुमेहावरील औषधनिर्मितीसाठी ‘शक्ती’ योजनेअंतर्गत 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कर्करोग रुग्णांसाठी 17 औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी माफ करण्यात आली आहे.
रेल्वे व पायाभूत सुविधांना गती
अर्थमंत्र्यांनी 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची घोषणा केली. पुढील पाच वर्षांत 20 नवीन जलमार्ग सुरू होणार असून वाराणसी व पाटणा येथे जहाज दुरुस्ती सुविधा उभारली जाणार आहे.
‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत 1,337 रेल्वे स्थानकांचे पुनर्विकास, त्यापैकी 1,197 स्थानकांवर काम सुरू आहे. वंदे भारत गाड्या आणि बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 21,000 कोटींची गुंतवणूक कायम राहणार आहे.
करप्रणालीत बदल; मध्यमवर्गाला दिलासा
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल न करता, रिवाइज्ड रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरऐवजी 31 मार्च करण्यात आली आहे.
परदेश प्रवास, शिक्षण व उपचारासाठी पाठवण्यात येणाऱ्या रकमांवरील TCS फक्त 2% करण्यात आला आहे. याआधी हा दर 5 ते 20% होता.
SME आणि उद्योगांसाठी मोठी घोषणा
लघु व मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटी रुपयांचा SME ग्रोथ फंड जाहीर करण्यात आला आहे. TReDS प्लॅटफॉर्मद्वारे क्रेडिट गॅरंटी सपोर्ट देण्यात येणार असून छोट्या उद्योगांना ‘चॅम्पियन’ बनवण्याचा सरकारचा मानस आहे.

शेअर बाजाराला धक्का
बजेटनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.
सेन्सेक्स 1,546 अंकांनी घसरून 80,722 वर, तर निफ्टी 495 अंकांनी घसरला.
F&O ट्रेडिंगवरील STT वाढवण्यात आली –
- फ्युचर्स: 0.02% → 0.05%
- ऑप्शन्स: 0.10% → 0.15%
सोने-चांदी स्वस्त
सलग दोन दिवसांत चांदी ₹1.36 लाखांनी स्वस्त झाली असून सोन्याचे दरही ₹31 हजारांनी घसरले. नफावसुलीमुळे बाजारात ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महिला सक्षमीकरणावर विशेष भर
बजेट 2026 मध्ये महिला सशक्तीकरणासाठी नव्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि सुरक्षित वातावरण देणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
राजकीय प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बजेटला ‘2047 पर्यंत विकसित भारताचा मजबूत पाया’ असे संबोधले.
तर विरोधकांकडून टीका झाली असून राहुल गांधी यांनी ‘युवकांसाठी काहीच नाही’ अशी प्रतिक्रिया दिली, तर ममता बॅनर्जी यांनी बजेट ‘विखरलेले’ असल्याचे म्हटले.

